अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड(प्रतिनिधी) :- राशिन ता. कर्जत ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फलकाची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली. ही घटना २ ऑगस्ट रोजी घडली असून, या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तसेच सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज (दिनांक ५ ऑगस्ट) रोजी अंबड पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रभर महात्मा फुले यांचे विचार पुसण्याचा प्रयत्न काही जातीयवादी घटकांकडून सातत्याने होत आहे. अशाच प्रकारे २०१४ साली राशिन ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावानुसार गावातील चौकात उभारण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या फलकाची नुकतीच तोडफोड व विटंबना करण्यात आली. यामुळे राज्यभरातील अनुयायांच्या भावना दुखावल्या असून, समाजात प्रक्षोभ निर्माण झाला आहे.
दोषींवर त्वरित कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला गेला. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश संघटक रविंद्र साहेबराव खरात, नंदू पुंड, रामशेठ लांडे, भालचंद्र भोजने,समता परिषदेचे शहराध्यक्ष आकाश रहाटगावकर, योगेश शेटे, अॅड. लक्ष्मण गायके, दिनेश गाजरे, अॅड. बाळासाहेब लोहकरे, दिलीप राठोड, शाम खरे, नाथा खरात, प्रमोद राऊत, गजानन पुरी, भगवान खंडागळे, किरण रहाटगावकर, किशोर रहाटगावकर, अनिकेत मगर, अशोक भागवत, विठ्ठल खरात, एकनाथ घायाळ, सुभाष जाधव, गणेश राऊत, कुणाल साखरे, लहू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment
0 Comments