388 प्रकरणांवर कारवाई; 8 वाहनचालकांवर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याबद्दल गुन्हे
जालना – जिल्ह्यात वाहतूक शिस्तीचे पालन व्हावे आणि अपघाताच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी जालना जिल्हा पोलिसांकडून काल (दि. 07 ऑगस्ट 2025) संध्याकाळी 5 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत विशेष नाकाबंदी मोहिम राबविण्यात आली.
ही मोहीम मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या आदेशानुसार व सूचनांनुसार, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत प्रभावीपणे पार पडली.
कारवाईचा आढावा
नाकाबंदी दरम्यान विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध 388 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. त्यामध्ये —
वाहनावर नंबरप्लेट न लावणे
फॅन्सी नंबरप्लेटचा वापर
ट्रिपल सीट वाहन चालविणे
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे
वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्मचा वापर
या सर्वांवर एकूण ₹3,49,250/- इतका दंड वसूल करण्यात आला.
तसेच, मद्यधुंद अवस्थेत धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या 8 वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले.
पुढील काळात अधिक कठोर कारवाई
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही मोहीम केवळ एकदाच नव्हे तर आगामी काळातही सातत्याने राबवली जाणार आहे. वाहनावर नंबरप्लेट न लावणे, फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपल सीट वाहन चालविणे, मोबाईलवर बोलणे, काळ्या फिल्मचा वापर, तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे अशा प्रकारच्या उल्लंघनांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
नागरिकांना आवाहन
मा. पोलीस अधीक्षक जालना यांनी सर्व नागरिकांना मोटार वाहन कायद्यातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, शिस्तबद्ध वाहतूक आणि सुरक्षित प्रवासासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


Post a Comment
0 Comments