हरतखेडा/प्रतिनिधी गणेश शेरे
अंबड तालुक्यातील हरतखेडा परिसरात आज सकाळपासून दोन सततदार जोरदार सरींची बरसात झाल्याने शेतकरीवर्ग आनंदाने न्हाऊन निघाला आहे. आकाशात गडगडाटासह बरसणाऱ्या पावसाने गावोगावी नवा उत्साह ओतला आहे. मठपिंपळगाव, नागझरी, आलमगाव, धनगरपिंप्री, शेवगा, दहिपूरी, सारंगपूर, कालखंडात, बठान आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जमिनीला ओल मिळाल्याने पिकांनी टवटवीतपणा धरला आहे.
सोयाबीन, मका, तूर, बाजरी आणि कपाशी यांसह डाळी, कडधान्ये आणि भाजीपाला पिकांना पाण्याचा तजेला मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फळबागांमधील आंबा, डाळिंब, लिंबू, पेरू यांसारख्या बागायती पिकांना देखील या पावसाचा मोठा फायदा होणार आहे. जमिनीत झालेली ओलामुळे तण कमी होण्यास मदत होईल, तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता असल्याने पिकांचा दर्जाही सुधारेल.
पावसाच्या योग्य वेळी झालेल्या हजेरीमुळे खतांचा परिणाम वाढणार असून उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतकरी आता पुढील पिकसंवर्धन, तणनियंत्रण आणि कीडनियंत्रणाच्या कामात गती आणण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे हास्य फुलले आहे. “हा पाऊस म्हणजे आमच्या पिकांसाठी अमृतसरी” असे मत स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत. जमिनीचा सुगंध आणि हिरवाईने नटलेले शेत पाहून हरतखेडा परिसरातील शेतकरी नव्या जोमाने हंगाम हाती घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.



Post a Comment
0 Comments