अंबड वार्ता प्रतिनिधीआकाश जळके
दिनांक ५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्याने घनसावंगी तालुक्यातील गंगाराम वाडी येथे मोठा कहर केला. या आपत्तीत येथील रहिवासी श्री शंकर रामसिंग चव्हाण (गट क्र. ६४) यांच्या सोलर यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या वादळी पावसामुळे सोलर पॅनलचे पत्रे व उपकरणे तुटून उडाली. त्यामुळे सोलर यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली असून, शेतकी व घरगुती वापरासाठी उभारलेली ही यंत्रणा कोसळल्याने चव्हाण कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे.
या घटनेबाबत गावकऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान तर झालेच, आता सोलर यंत्रणाही उद्ध्वस्त झाली आहे. “कष्टाने उभारलेले सोलर पॅनल काही क्षणात पावसाने नेस्तनाबूत केले. आता शासनाने तरी मदतीचा हात द्यावा,” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, शेतकरी व ग्रामस्थांनी शासनाने तातडीने पंचनामा करून हे नुकसान नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून योग्य ती मदत जाहीर करावी, अशी ठाम मागणी केली आहे.

Post a Comment
0 Comments