अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
जालना: मराठा आरक्षणाच्या संघर्षात एक हृदयस्पर्शी गोष्ट समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या 'धनगर पिंपरी' या छोट्याशा गावाने माणुसकीचा एक मोठा संदेश दिला आहे. मराठा बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचे उपोषण पाहून गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी तब्बल १० क्विंटल भाकरी, पोळ्या, ठेचा, लोणचं आणि पाणी मुंबईला पाठवले आहे.
एकतेची ज्योत पेटली, महिलांनी मायेने बनवली भाकरी
धनगर पिंपरी गावातील ही कृती केवळ एक मदत नाही, तर ती महाराष्ट्रातील एकतेचे प्रतीक बनली आहे. गावातील मराठा आणि इतर समाजाच्या लोकांनी कोणताही भेदभाव न करता एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला. गावातील महिलांनी मोठ्या संख्येने पुढे येत रात्रभर जागून प्रेमाने आणि मायेने भाकरी बनवल्या. पुरुषांनी इतर सामानाची जमवाजमव केली.
एका ट्रकमध्ये हे सर्व अन्न भरताना गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात एक प्रकारची आपुलकी होती. आंदोलकांचे कष्ट पाहून आम्ही शांत बसू शकलो नाही, अशी भावना एका ग्रामस्थाने व्यक्त केली. "आम्ही फक्त भाकरी पाठवली नाही, तर आमचा पाठिंबा आणि प्रेम पाठवले आहे," असे ते म्हणाले. या कृतीतून हे स्पष्ट झाले की, संकटाच्या वेळी संपूर्ण समाज एकत्र उभा राहतो.

Post a Comment
0 Comments